घोडबंदर सेवा रस्त्याच्या मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत दिवसा या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवणे आवश्यक आहे. तरच नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळू शकेल. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी मिरा-भाईंदर आणि पालघर वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहनांना मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच परवानगी द्यावी. त्याबदद्लची अधिसूचना लवकरात लवकर काढावी, असे निर्देष परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर, घोडबंदर सेवा रस्त्याच्या विलिनीकरणाचे उर्वरित काम १५ सप्टेंबरपासून सुरू करून ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी एमएमआरडीएने आखलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांबाबत आढावा घेण्यासाठी गुरूवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालय येथील कै. अरविंद पेंडसे सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उप जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील , पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, विनोद पवार, गुणवंत झांब्रे, शुभांगी केसवानी, उपायुक्त शंकर पाटोळे, मनीष जोशी, दिनेश तायडे, मधुकर बोडके, बैठकीचे समन्वय अधिकारी कार्यकारी अभियंता संजय कदमल यांच्यासह महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत, घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी, तिसरे नाट्यगृह, वर्तकनगर येथील म्हाडा आणि शॉप किपर्स सोसायटीचा विषय, नागला बंदर येथील आरमार प्रकल्प, समाज मंदिरे, लता मंगेशकर संगीत विद्यालय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय, तलाव सुशोभीकरण, स्वामी समर्थ मठाचे स्थलांतर यांच्यासह ओवळा-माजिवडा क्षेत्रातील सर्व विकास कामांचा आढावाही घेण्यात आला.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून कामांची गती चांगली राखली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणे शक्य होईल, असेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी स्पष्ट केले.
